rahuri : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीने पुन्हा एकदा स्थानिक राजकारण तापले आहे. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर निर्माण झालेली ही जागा पक्षासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपने परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या मुलाला, अक्षय कर्डिले उमेदवारी जाहीर केली आहे.

राहुरी हा मतदारसंघ गेल्या काही वर्षांत भाजपचा मजबूत गड मानला जातो. कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ग्रामीण आणि सहकार क्षेत्रात मजबूत पकड निर्माण केली होती. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट आणि संघटनात्मक ताकद यांचा फायदा घेत भाजपने घराणेशाहीचा धोका पत्करत अक्षय कर्डिले यांच्यावर विश्वास ठेवला आहे. ते सध्या “शिव निर्धार यात्रा”च्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

दुसऱ्या बाजूला, प्राजक्त तनपुरे यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. 2019 मध्ये त्यांनी कर्डिले यांचा पराभव करून मतदारसंघ जिंकला होता आणि नंतर ऊर्जामंत्रीही झाले. मात्र 2024 मध्ये कर्डिले यांनी तब्बल 34000 मतांनी पुनरागमन करत राजकीय समीकरण बदलले. आता पुन्हा एकदा ही लढत थेट कर्डिले विरुद्ध तनपुरे अशी रंगण्याची शक्यता आहे.
स्थानिक पातळीवर साखर कारखान्याचा मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरत आहे. डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर सुमारे 600 कोटींचे कर्ज असून तो अद्याप सुरू न झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. ही नाराजी मतदानावर परिणाम करू शकते.
राहुरी नगरपालिकेत मात्र तनपुरे गटाने 17 जागा जिंकून आपली ताकद कायम ठेवली आहे. त्यामुळे ग्रामीण विरुद्ध शहरी असे वेगळे समीकरण तयार झाले आहे.
ही पोटनिवडणूक फक्त एक जागा भरण्यापुरती मर्यादित नाही; ती आगामी 2029 च्या राजकीय दिशेचा संकेत देणारी ठरू शकते. भाजप आपला गड टिकवते की तनपुरे पुन्हा आव्हान उभं करतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.







