Pune : पुणे महानगरपालिका निवडणुकीत शंभरहून अधिक जागा जिंकायचं ‘मिशन 100 प्लस’ घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपसमोर आता स्वतःचाच मित्रपक्ष अडसर ठरताना दिसतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी भाजपसाठी मोठं आव्हान बनली असून, त्यामुळे भाजपच्या गोटात चांगलीच धाकधूक आहे.

अजित पवारांनी निवडणुकीत खेळलेली आक्रमक रणनीती, काही ठिकाणी शरद पवार गटाशी जमवलेली पडद्यामागची समीकरणं, आणि त्यातच भाजपमधील काही बंडखोरांना आपल्या गटात घेऊन उमेदवारी देण्याचा डाव – या सगळ्यामुळे अनेक प्रभागांत भाजपची मतं फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच भाजपचं ‘मिशन 100 प्लस’ अडचणीत आलं असल्याची चर्चा सुरू आहे.
यात भर म्हणजे काही खाजगी आणि शासकीय सर्वेक्षणांमध्ये भाजपची कामगिरी अपेक्षेइतकी दमदार दिसत नाही, असे संकेत मिळाले आहेत. हे अहवाल समोर आल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघाडणी केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काल रात्री कात्रज येथील जाहीर सभेत फडणवीस यांनी अजित पवारांचं नाव न घेता, त्यांच्या जुन्या कार्यपद्धतीवर टोला लगावला. मात्र खरी राजकीय हालचाल सभा संपल्यानंतर पाहायला मिळाली.
सभा आटोपल्यानंतर फडणवीस विमानतळाकडे निघाले असताना खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील एकाच गाडीत होते. त्याच वेळी चंद्रकांत पाटील तिथे पोहोचले. फडणवीसांनी स्वतः मुरलीधर मोहोळ यांना बोलवण्याचे आदेश दिले आणि त्यावर चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या आवाजात “अण्णा… अण्णा…” अशी हाक मारत मोहोळ यांना घाईत बोलावून घेतलं.
यानंतर विमानतळावर या तीन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड दीर्घ चर्चा झाली. या बैठकीत फडणवीसांनी पुण्यातील सर्व 165 प्रभागांचा सविस्तर आढावा घेतला. ज्या ठिकाणी भाजपची स्थिती कमकुवत आहे, किंवा जिथे सर्वेक्षण भाजपविरोधात गेले आहेत, तिथे तात्काळ रणनीती बदलण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.
“गाफील राहू नका. कोणत्याही परिस्थितीत विजयाचा आकडा गाठलाच पाहिजे,”
अशा कडक शब्दांत फडणवीसांनी स्थानिक नेतृत्वाची चांगलीच शाळा घेतली.
एकंदरीत, पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये अस्वस्थता वाढली असून, अजित पवारांच्या हालचालींमुळे राजकीय गणितं बदलताना दिसत आहेत. आता पुढचे काही दिवस भाजपसाठी निर्णायक ठरणार, हे मात्र नक्की.







