राहुलकुमार अवचट

यवत: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने यवत येथे सुमारे 1 किमी अंतरावर बसवण्यात आलेले हायमास्ट दिवे अखेर सुरू झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज महामार्गावरील हे दिवे प्रकाशमान झाल्याने यवत गावाला नवी झळाळी मिळाली आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या यवत येथे गेल्या अनेक वर्षांपासून पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत होते. अखेर डिसेंबर महिन्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विजेचे खांब उभे करण्यात आले, परंतु ४ महिने उलटूनही हे दिवे बंदच असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत ‘दैनिक पुणे प्राईम’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
त्यावेळी महामार्ग प्रशासन व महावितरण विभागाच्या वतीने लवकरच पथदिवे सुरू केले जातील, अशी ग्वाही देण्यात आली होती. त्यानुसार, आज पुणे-सोलापूर महामार्गाशेजारी बसवण्यात आलेले सुमारे १६० दिवे सुरू झाले आहेत. यामुळे यवत परिसरात मोठा उजेड पडला असून गावच्या वैभवातही भर पडली आहे.
यवत परिसरात अनेक महिन्यांपासून पथदिवे नसल्याने रहिवाशांना अंधारात चाचपडत ये-जा करावी लागत होती. रात्रीच्या वेळी वाहनांचा अंदाज न आल्याने होणारे अपघात, महामार्गाशेजारी होणाऱ्या चोऱ्या आणि रस्ता ओलांडताना वाढलेले अपघात यामुळे नागरिक धास्तावले होते. आज अखेर गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले हे दिवे सुरू झाल्याने नागरिक व वाहनचालकांची गैरसोय दूर झाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यवत येथील सेवा रस्त्याच्या (Service Road) सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुमारे 1 किमी अंतरावर हे हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. महावितरण व महामार्ग प्रशासनाच्या आश्वासनाप्रमाणे वीजपुरवठा सुरळीत झाला असून, महामार्गावरील अंधार दूर झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झगमगाट झाला आहे. या पथदिव्यांमुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.







