आदित्य बोराटे

पुणे: पुणे जिल्हा परिषदेतील सुरू असलेल्या शिक्षक पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ व अनुभवी शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई सागर मिसाळ यांनी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे निवेदन देत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत १ सप्टेंबर २०२५ नंतरच पदोन्नती प्रक्रिया राबवावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

या निवेदनात म्हणले आहे की, टीईटी व सीटीईटी परीक्षेचे निकाल २०२६ मध्ये जाहीर झाल्यामुळे पात्र ठरलेल्या अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांना सध्या सुरू असलेल्या पदोन्नती प्रक्रियेतून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ही बाब समान संधी, सेवाज्येष्ठता आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना बाधा पोहोचवणारी असल्याचे मिसाळ यांनी म्हटले आहे.
सध्या सुरू असलेली पदोन्नती प्रक्रिया तात्काळ स्थगित करून २०२६ मध्ये पात्र ठरलेल्या सर्व शिक्षकांचा त्यामध्ये समावेश करावा, सेवाज्येष्ठता व अनुभवाला न्याय देत पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवावी, तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतेही पदोन्नती आदेश काढू नयेत, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
अन्यथा मोठ्या प्रमाणावर तक्रारी, न्यायालयीन याचिका आणि प्रशासकीय वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.







