पुणे: नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या एका निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी घोषित केले आहे. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली असून, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या प्रकरणाची सुनावणी विशेष सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्यासमोर पार पडत आहे. राजगड पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यांत १२०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, डीएनएफ अहवाल आणि वैद्यकीय पुरावे गोळा करून आरोपीविरोधात भक्कम केस उभी केली, ज्या आधारे सर्व आरोप सिद्ध झाले आहेत.

न्यायालयातील सुनावणीवेळी आरोपीने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी एक खोटा बनाव रचला. न्यायालयाने “सर्व आरोप सिद्ध झालेत, आता तूच सांग तुला काय शिक्षा मिळावी?” दरम्यान, त्याला शिक्षेबाबत विचारले असता, तो निर्लज्जपणे म्हणाला की, मी तर मुलीला खाऊ ( गाठी शेव) द्यायला नेले होते, पण अचानक पाय घसरल्याने आम्ही पडलो आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. आरोपीचा हा खोटा दावा ऐकून न्यायाधीश संतापले. पुराव्यांची साक्ष देत न्यायालयाने त्याला त्याचे कृत्य गंभीर असल्याचे सुनावले.
सरकारी वकिलांनी या गुन्ह्यातील क्रौर्य लक्षात घेता आरोपीला फाशीची शिक्षाच हवी, अशी आग्रही मागणी केली आहे. पीडित मुलीचे कुटुंबीय आणि संपूर्ण समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. न्यायालयाने आता या खटल्याचा निकाल राखून ठेवला असून, येत्या सोमवारी २९ जून रोजी यावर अंतिम निर्णय दिला जाणार आहे. पोलिसांनी केलेल्या जलद तपासामुळे हा खटला लवकर निकाली लागला असून, कोर्ट आता काय शिक्षा देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.







