इंदापूर, (पुणे) : वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेतकऱ्यांचे शेती साहित्य, सोलर मोटार पंप, ट्रॅक्टर, ट्रॉली, चारचाकी पिकअप वाहने आणि केबल वायर चोरणाऱ्या टोळीचा वालचंदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 सराईत चोरांच्या टोळीला अटक केली आहे.

जयदीप नानासो घोळवे (वय 22, रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे), मेघराज नानासो आंबासे (वय -22 रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे) आकाश विलास शिंदे(वय-23, रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत वाढत्या शेती साहित्य चोरीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना सर्व पोलीस स्टेशनला दिले होते. त्यानुसार वालचंदनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्तीवर असताना, पोलीस हवालदार कीर्तीलाल गायकवाड व पोलीस अंमलदार गणेश वानकर यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, जयदीप घोळवे व त्याचे साथीदार लाकडी, शिंदेवाडी आणि भवानीनगर परिसरातून शेतकऱ्यांच्या ट्रॉली चोरी करत आहेत.

माहिती मिळताच पोलिसांनी भवानीनगर परिसरात सापळा रचून जयदीप घोळवे व मेघराज आंबासे या दोघांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी आकाश शिंदे याच्या साथीने वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप व मोटार चोरी केल्याची कबुली दिली.
दरम्यान, आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून एक न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर, एक चार चाकी ट्रॉली, एक महिंद्रा कंपनीची चारचाकी पिकअप गाडी, एक सौरऊर्जा संचलित मोटार पंप (सोलर पंप), ट्रॉली चोरी करण्यासाठी वापरलेला ट्रॅक्टर असा मुद्देमाल मिळून आला. तिघांवरही वालचंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२)** अन्वये नोंद असलेले 3 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी पोवरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक *राजकुमार डुनगे*, पोलीस हवालदार कीर्तीलाल गायकवाड, अजित थोरात, परिमल माणेर, अजित भाग्यवंत, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजित कळसकर व राहुल माने यांनी केली आहे.







