लोणी काळभोर : तीर्थक्षेत्र रामदरा रोड आणि सिद्राम मळा परिसरातून सुरू असलेल्या भरधाव अवजड वाहतुकीविरोधात स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मार्गावरून नियमबाह्य व धोकादायक पद्धतीने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. ४) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन तातडीने कठोर कारवाईची मागणी केली.

यावेळी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर उर्फ सनी काळभोर, भाजपचे हवेली सरचिटणीस कमलेश काळभोर, माजी सरपंच योगेश काळभोर, राष्ट्रवादीचे युवराज काळभोर, माजी चेअरमन विठ्ठल काळभोर, प्रशांत बबन काळभोर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून फुरसुंगी रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावरून सिमेंट, लोखंड तसेच पुणे महापालिकेच्या कचऱ्याची वाहतूक करणारे ट्रेलर, टिपर आणि इतर अवजड वाहने रामदरा रोडवरून सातत्याने धावत आहेत. तब्बल ४० ते ५० टनांहून अधिक वजन घेऊन अतिवेगाने धावणाऱ्या या वाहनांमुळे परिसरातील नागरिक, दुचाकीस्वार, पादचारी, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उघडपणे उल्लंघन करत असून, समोरून येणाऱ्या वाहनांना किंवा पादचाऱ्यांना रस्ता देण्याचीही तसदी घेत नाहीत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या समस्येबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वाहतूक रोखल्याचे कारण पुढे करून संबंधित ठेकेदाराने एका नागरिकाविरोधात खंडणीचा अर्ज दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, अवजड वाहनांचा वेग आणि बेफिकीर वाहतूक अद्यापही कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
रामदरा रोडवरील अवजड वाहनांच्या वेगावर तातडीने नियंत्रण आणावे, वाहतूक पोलिसांचे नियमित पथक तैनात करावे, तसेच संबंधित कंपन्या व ठेकेदारांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशीही एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली.
“लोणी काळभोरमधील कोणत्याही शेतकऱ्याने खंडणीची मागणी केलेली नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि जनहितासाठीच आम्ही अवजड वाहतुकीला विरोध करत आहोत. रेल्वे प्रशासनाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चुकीचा अर्ज दिला आहे. या अवजड वाहतुकीस कोणतीही अधिकृत परवानगी नसून, पोलीस प्रशासनानेही ती थांबवण्याचे आश्वासन दिले आहे.”
– युगंधर उर्फ सनी काळभोर
माजी उपसभापती, पंचायत समिती हवेली
“फुरसुंगी येथील मालधक्क्यातून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीचा नाहक त्रास लोणी काळभोरच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. या कथित अनधिकृत वाहतुकीला नागरिकांनी लोकशाही मार्गाने विरोध केला असताना, शेतकऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चुकीचा अर्ज दिल्याचा आमचा आरोप आहे. राजकीय दबाव टाकून शेतकऱ्यांना गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. गरज पडल्यास प्रशासनाविरोधात तीव्र लोकशाही लढा उभारू.”
– कमलेश काळभोर
सरचिटणीस, हवेली भाजप







