उरुळी कांचन, ता. 27 : भवरापूर (ता. हवेली) येथील शेतकरी कैलास साठे यांनी (Uruli Kanchan News) खाजगी सावकाराच्या छळाला कंटाळून रविवारी (ता. 25) आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता सोरतापवाडी (ता. हवेली) येथे एका व्यावसायिकानेसुद्धा खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी (ता. 26) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याने उरुळी कांचनसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

महादेव विठ्ठल जरांडे (वय 38, रा. डाळिंब, ता. दौंड) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव असून, त्यांच्यावर उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव जरांडे हे सोरतापवाडी येथे जुन्या चारचाकी वाहनांची खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय करीत आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या व्यवसायात मोठा तोटा झाल्याने त्यांनी व्यवसाय सावरण्यासाठी एका महिलेसह चार खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. सुरुवातीला जमेल तसे त्यांनी व्याज व मुद्दल परतफेड केली; मात्र कालांतराने व्याजाचा बोजा प्रचंड वाढत गेला.
व्याजाची रक्कम देणे अशक्य होत चालल्याने काही खाजगी सावकारांनी थेट त्यांच्या चारचाकी गाड्याच उचलून नेल्याची माहिती आहे. एवढे होऊनही सावकारांनी व्याजासाठी तगादा लावणे सुरूच ठेवले. या मानसिक छळाला कंटाळून महादेव जरांडे यांनी सोरतापवाडी येथील आपल्या कार्यालयातच शेतातील विषारी कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
दरम्यान, कार्यालयात आलेल्या मित्रांना जरांडे हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांनी तातडीने त्यांना उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला असून प्रकृती स्थिर आहे.
सुसाईड नोटने उडवली खळबळ
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी महादेव जरांडे यांनी सुसाईड नोट लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या नोटमध्ये त्यांनी एका महिलेसह चार खाजगी सावकारांची स्पष्ट नावे नमूद केल्याचे समजते. या सुसाईड नोटमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून खाजगी सावकारकीचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा उघड झाले आहे.
48 तासांत दोन टोकाच्या घटना; प्रशासन झोपेतच?
उरुळी कांचन परिसरात अवघ्या 48 तासांत शेतकऱ्याची आत्महत्या आणि व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न या दोन घटना घडल्याने खाजगी सावकारकीचे जाळे किती घट्ट पसरले आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. सुसाईड नोटमध्ये नावे समोर आल्यानंतरही पोलीस व प्रशासन कोणती ठोस कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून ‘आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?’ असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे.







