Politics : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असतानाच, ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्यात एमआयएमने जिंकलेल्या पाच जागांनी राजकीय चर्चेला वेगळी दिशा दिली. विशेषतः एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांच्या विजयानंतर केलेल्या भाषणामुळे मोठा वाद निर्माण झाला. “कैसा हराया…” असा थेट उल्लेख करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेली टिप्पणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.

या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक प्रतिक्रिया दिली. मुंब्र्यात आयोजित त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यापूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी “कोण आया, शेर का शिकारी आया” अशा घोषणा दिल्या जात होत्या. या घोषणांबाबत विचारले असता आव्हाड म्हणाले, “आजकाल अशा घोषणा प्रत्येक गल्लीबोळात ऐकायला मिळतात. ही नवीन पोरं कल्पकपणे घोषणा देतात. त्याला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही.”

सहर शेख यांच्या वक्तव्यावर बोलताना आव्हाड यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “एखादी लहान मुलगी मिश्किलपणे काहीतरी बोलते आणि ते सोशल मीडियावर व्हायरल होतं. त्यात फार अर्थ काढण्याची गरज नाही. ते बालिशपण आहे,” असा टोला त्यांनी लगावला. “माझी लहान मुलगी ‘चॉकलेट लाया’ असं म्हटलं तरी ते व्हायरल होईल, यात काही विशेष नाही,” असे म्हणत त्यांनी हा वाद फुगवण्यास नकार दिला.
एमआयएमच्या विजयावर प्रतिक्रिया देताना “हाथी चले अपनी चाल, कुत्ते भोके हजार” अशा शब्दांत आव्हाड यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष उत्तर दिले. मात्र त्यांनी चर्चेचा केंद्रबिंदू स्पष्टपणे बदलत एक महत्त्वाचा राजकीय संदेश दिला. “मुंब्रा तिरंगा आहे. हा देश तिरंगा आहे, महाराष्ट्र तिरंगा आहे. संविधानाने या देशाला तिरंगा दिला आहे. कोणत्याही एका रंगाची मक्तेदारी इथे चालणार नाही,” असे आव्हाड ठामपणे म्हणाले.
या विधानातून मुंब्र्यातील राजकारण केवळ निवडणूक निकालापुरते मर्यादित नसून, ओळख, संविधान आणि लोकशाही मूल्यांभोवती फिरत असल्याचे स्पष्ट होते. (Politics)







