विशाल शिंदे

राजगड: राजगड पोलीस ठाण्याचा कार्यभार नुकताच स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या सात-आठ दिवसांत कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच कंपनीतील कामगारांची पोलीस पडताळणी, भाडेकरूंची नोंद, युवकांमधील व्यसनाधीनतेवर नियंत्रण, पॉक्सो व सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती आणि गावोगावी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पीआय संतोष जाधव म्हणाले की, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. गुटखा विक्री, पानमसाला, हातभट्टी दारू, गावठी दारू, मटका, जुगार, गांजा तसेच इतर बेकायदेशीर धंदे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. अशा व्यवसायांविरोधात सातत्याने धडक कारवाया करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
औद्योगिक कंपन्या, कारखाने आणि विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांची तसेच सिक्युरिटी गार्डसह इतर कर्मचाऱ्यांची माहिती संबंधितांनी राजगड पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कर्मचाऱ्याची पोलीस पडताळणी करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक असून याबाबतच्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार तसेच कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
घरमालकांनी आपल्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती, ओळखपत्रे आणि भाडेकराराची प्रत पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. भाडेकरूंची योग्य नोंद ठेवल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले.
सध्याची तरुण पिढी विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत पीआय जाधव यांनी युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगितले. युवकांनी निरोगी आणि सुदृढ जीवन जगावे यासाठी सामाजिक सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी पॉक्सो कायद्याबाबत तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांना सावध करण्यासाठी गावोगावी जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायत स्तरावर या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावोगावी आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रामपंचायती आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही यंत्रणा उभारली जाईल, असे त्यांनी सांगितले.
शाळांच्या परिसरातील टपऱ्यांवर गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर विशेष कारवाई केली जाणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. तसेच बुलेट किंवा इतर दुचाकींना बदललेले सायलेंसर बसवून कर्कश आवाज करणाऱ्या वाहनचालकांवरही विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कोणत्याही अवैध धंद्याची किंवा गुन्हेगारीची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. पोलिसांना नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास परिसर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास व्यक्त करत पीआय संतोष जाधव यांनी सर्व नागरिकांनी पोलिसांच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.







