मुंबई: देशभरातील नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. पुन्हा पेपरफुटी होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. पेपरफुटीची साखळी तोडण्यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून टेलिग्राम अॅपवर तात्पुरती बंदी घातली आहे. ही बंदी २२ जूनपर्यंत लागू राहणार आहे. इतकेच नाही, तर परीक्षेच्या गोपनीयतेसाठी ३० जूनपर्यंत मेसेज एडिट करण्याच्या पर्यायावरही सरकारने निर्बंध आणले आहेत.

या पेपरफुटीमुळे ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घ्यावा लागला होता. आता ही परीक्षा २१ जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. या फेरपरीक्षेदरम्यान कोणतीही गैरप्रकार घडू नये, यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून त्यानुसार खबरदारी घेत आहे.

नीट पेपरफुटीचे गंभीर धागेदोरे महाराष्ट्रातही आढळून आले आहेत. या प्रकरणाचा तपास करताना पुणे, लातूर आणि नाशिकमधून आतापर्यंत १३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यामध्ये ९ आरोपी हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील आहेत. या टोळीवर परीक्षार्थींना पैसे घेऊन प्रश्नपत्रिका पुरवणे आणि त्यासंबंधी हस्तलिखित नोंदी ठेवल्याचा गंभीर आरोप आहे. दरम्यान,या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.







