शिरूर: अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर,शिरूर शहरापासून जवळच असलेल्या सतरा कामानी पुलालगत गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) परिसरात जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार झाल्याची घटना रविवारी (ता.14) दुपारी घडली. चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती असून, गोळ्या लक्ष्यापासून चुकल्याने सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेमुळे गव्हाणेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी बाराच्या सुमारास गव्हाणेवाडी हद्दीत दोन तरुण रस्त्याच्या कडेला उभे होते. यावेळी चारचाकी वाहनातून काही जण तेथे आले. त्यानंतर त्यांनी दोन्ही तरुणांच्या दिशेने गोळीबार केला.हल्लेखोरांनी तीन वेळा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, नेम चुकल्याने दोन्ही तरुण थोडक्यात बचावले. गोळीबारानंतर परिसरात आरडाओरड झाल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हल्लेखोर चारचाकी वाहनातून भरधाव वेगाने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ज्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ज्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे, त्या दोन्ही गटांतील तरुण पारनेर तालुक्यातील असल्याचे समजते. ही घटना जुन्या वादातून घडली असण्याची शक्यता असून,नेमका वाद कशामुळे झाला आणि गोळीबारामागील कारण काय? याचा तपास पोलीस करीत आहेत.
या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत आरोपी तसेच फिर्यादी यांची नावे पोलिसांकडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नव्हती.
सीमावर्ती भागातील गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी
गव्हाणेवाडी आणि शिरूर शहर परिसर हा पुणे व अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेलगत असल्याने दोन्ही जिल्ह्यांच्या पोलिसांनी समन्वयाने कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर असल्याची नागरिकांमध्ये चर्चा असून, सीमावर्ती भागात पोलिसांची अधिक प्रभावी गस्त व तपासणी वाढविण्याची मागणी होत आहे.
अहिल्यानगर आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन राबवून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच सीमावर्ती भागात पोलिसांची उपस्थिती वाढवावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
गोळीबाराच्या या घटनेमुळे गव्हाणेवाडी परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या तपासानंतर या घटनेमागील नेमके कारण आणि हल्लेखोरांची माहिती स्पष्ट होणार आहे.







