सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथे उजनी उजव्या कालव्यात बुडून दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समर्थ नागनाथ बोबडे (वय १६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. समर्थ हा केसकरवाडी येथील शिवराम केसकर मागासवर्गीय निवासी वसतिगृहात राहून दहावीचे शिक्षण घेत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी समर्थ काही मित्रांसोबत वसतिगृहाजवळील उजनी उजव्या कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेला होता. कपडे धुत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो कालव्यातील वेगवान पाण्याच्या प्रवाहात पडला. पाण्याचा अंदाज न आल्याने समर्थ प्रवाहासोबत वाहून गेला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करून मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र, पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने समर्थला वाचवता आले नाही.

या घटनेनंतर समर्थचे वडील नागनाथ प्रभाकर बोबडे यांनी वसतिगृह प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवासी वसतिगृहात राहणारा अल्पवयीन विद्यार्थी बाहेर कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेला असताना सुरक्षा रक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष का नव्हते, असा सवाल त्यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच वसतिगृह चालक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोष आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बोबडे यांनी केली आहे. दरम्यान, समर्थच्या मृत्यूमुळे बोबडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या प्रकरणी पोलीस आणि संबंधित विभागाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.






