पुणे: पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरात एका लग्नाच्या कार्यक्रमात काम करताना १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, बालमजुरी आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंडप व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताडीवाला रस्ता येथील मारुती मंदिराजवळ एका विवाह सोहळ्यानिमित्त हळदीचा कार्यक्रम पार पडला होता. ३ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम संपल्यानंतर यश प्रितियानी (वय 16) हा मुलगा मंडप उतरवण्याचे काम करत होता. याच दरम्यान त्याला अचानक विजेचा तीव्र झटका बसला. शॉक इतका जोरदार होता की यश जागीच बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अल्पवयीन मुलाकडून धोकादायक काम करून घेणे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवणे, हा व्यावसायिकाचा गंभीर निष्काळजीपणा असल्याचे समोर आले आहे. यशचे मामा धनंजय मापुसकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, बंडगार्डन पोलिसांनी मंडप व्यावसायिक आसिफ कासम सय्यद याच्याविरुद्ध निष्काळजीपणा आणि बालमजुरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.







