पुणे: पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा कणा असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरु होण्याची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या मार्गावरील पहिल्या टप्प्याची प्रवासी सेवा १५ जुलैपासून सुरू होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. मेट्रोच्या व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असणारा अंतिम सुरक्षा अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

सध्या हिंजवडी ते बालेवाडी या पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लागणारी अंतिम शासकीय परवानगी मिळण्यास विलंब होत आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा आता जुलैऐवजी थेट ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२३ किलोमीटर लांबीच्या या ‘मेट्रो ३’ प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत ५ वेळा मुदतवाढ दिली आहे. विविध सरकारी विभागांमधील समन्वयाचा अभाव आणि यंदाच्या जोरदार पावसामुळे बांधकामाच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे. आता ऑगस्ट महिन्यात तरी पुणेकरांचे मेट्रोने प्रवास करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







