पुणे: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांच्या तपासाला एक मोठे यश मिळाले असून, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या महाघोटाळ्यातील मुख्य सूत्रधार बिजेंदर कुमार (अर्फ बिजेंदर गुप्ता) याला गजाआड करण्यात आले आहे. परीक्षांचे पेपर ज्या राज्यांत छापले जायचे, त्याच ठिकाणाहून ते लीक करणे या टोळीला सोपे जात होते. ही संपूर्ण घटना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिजेंदर कुमार आणि त्याचा हरियाणातील साथीदार कपिल दहिया यांनी देशातील विविध सरकारी आणि स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक करण्यासाठी एक पद्धतशीर टोळी कार्यान्वित केली होती. आतापर्यंत या टोळीने २० पेक्षा जास्त महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. ही टोळी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाणा आणि दिल्ली यांसारख्या विविध राज्यांत आपले जाळे पसरवून सक्रिय होती.

टीईटी परीक्षेच्या नियोजित वेळेआधीच पोलिसांनी अतिशय गोपनीयरीत्या सापळा रचल्याने एक मोठा शैक्षणिक घोटाळा रोखला गेला आहे. या गुन्हेगारी नेटवर्कची व्याप्ती बिहार, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत पोहोचली असून, काही वरिष्ठ आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) अधिकारीही आता तपास यंत्रणेच्या निगराणीखाली आहेत.
परीक्षा परिषदेच्या दुर्लक्षामुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढले आणि पेपरफुटीसारखा गंभीर प्रकार घडला, अशी चर्चा आता शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे.
या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता, गुन्ह्यातील अधिक पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांची १० विशेष पथके देशाच्या विविध भागात रवाना करण्यात आली आहेत. या तपासातून लवकरच अनेक बडे चेहरे समोर येण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.






