पुणे: राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. या कालावधीत राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

७ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाट, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, वाशीम, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, नाशिक, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, अमरावती तसेच सातारा घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

८ जुलै रोजी पालघर, नाशिक घाट, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट राहणार आहे. याच दिवशी पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
९ जुलै रोजी रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, खंडाळा घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
१० जुलै रोजी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट कायम राहणार आहे. त्यानंतर ११ जुलै रोजी अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.





