पुणे, ता. ३० : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडात मृतांचा आकडा आता १९ वर पोहोचला असून अनेक जण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. मात्र, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग आली आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अवैध हातभट्टी आणि गावठी दारूच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला असला, तरी “१९ निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासन का जागे झाले?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, विषारी दारू प्रकरणात निष्काळजीपणा आणि कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी एकूण ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी यांच्यासह दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, उपनिरीक्षक राजू भास्कर, कर्मचारी जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव आणि विशाल काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

दुसरीकडे, राज्य उत्पादन शुल्क विभागालाही या प्रकरणात मोठा फटका बसला असून १३ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामध्ये ३ निरीक्षक, ६ दुय्यम निरीक्षक आणि ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अवैध दारूचा व्यवसाय वर्षानुवर्षे सुरू असताना संबंधित विभाग झोपेत होता का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी अनेक नागरिकांनी गावठी दारूचे सेवन केल्यानंतर त्यांना डोळ्यांची जळजळ, चक्कर येणे, अंधारी येणे, श्वसनाचा त्रास, छातीत दुखणे आणि तोंडातून फेस येणे अशी गंभीर लक्षणे दिसू लागली. अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र काहींना उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यूने गाठले. फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात झालेल्या या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक कुटुंबांचे आधारस्तंभ हिरावले गेले असून काही घरांमध्ये कमावती व्यक्ती गमावल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या मृत्यूंमुळे परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) बुधवारी बाबा शेख (वय ४५) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी राजेश शांताराम राजपूत (वय ५०), अकबर अझीमखान पठाण (वय ४८), आनंद पांडुरंग देसाई (वय ५३), आनंद काशिनाथ निकाळजे (वय ६४), पांडुरंग सखाराम फुगे (वय ५३), विजय प्रकाश राठोड (वय ३१) आणि राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी अक्षय अशोक अवसरमल (वय २८), सचिन रामचंद्र नेटके (वय ३६), भीमण्णा बसन्ना नागराल (वय २७), सुरप्पा मनप्पा बंगारी (वय ५५) आणि कबीर अब्दुल शहा (वय ४५, रा. फुगेवाडी) यांचा मृत्यू झाला.
हडपसर परिसरात अरुण वामन डाडर (वय ६०), यशवंत रघुनाथ पवार (वय ६४), दत्ता माधवराव सूर्यवंशी (वय ५५) आणि अशोक रमेश चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. तर विजय भुकूरलाल शर्मा (वय ४५) आणि प्रवीण जाधव (वय ५२) यांचाही विषारी दारू सेवनामुळे मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे पोलीस आणि दापोडी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह ८ ते १० जणांना अटक केली आहे.
प्राथमिक तपासात मिथेनॉल मिसळून गावठी दारू तयार करून तिची विक्री केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह १० जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, केवळ दारू विक्रेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून चालणार नाही. या अवैध व्यवसायाला संरक्षण देणारे, त्याकडे दुर्लक्ष करणारे आणि हप्तेखोरीच्या आरोपांमुळे संशयाच्या भोवऱ्यात आलेले अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
राज्यात हातभट्टी दारूवर बंदी असतानाही गावोगावी आणि शहरांमध्ये तिची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचे आरोप आहेत. त्यामुळे केवळ निलंबन करून प्रकरणावर पडदा टाकण्याऐवजी दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधासारखे गंभीर गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र, १९ जणांचे प्राण गेल्यानंतर झालेली कारवाई पुरेशी आहे का? की या मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या संपूर्ण साखळीला कायद्याच्या कठघऱ्यात उभे केले जाणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







