पुणे: पुण्यातील एक नामांकित व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा लोहगड किल्ल्यावर झालेला मृत्यू, हा केवळ एक अपघात नसून एक थंड डोक्याने रचलेला कट असल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण होऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची आग्रही मागणी केली आहे. “जर तिला लग्नाची इच्छा नव्हती, तर तिने तसा स्पष्ट नकार द्यायला हवा होता, पण कोणाचा तरी जीव घेण्यापर्यंत तिची मजल कशी गेली?” असा संतप्त सवाल विशाल अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे.

केतनच्या वडिलांनी हत्येच्या या कटात इतरही काही जणांचा हात असल्याची शक्यता वर्तवली आहे. सियाचा भाऊ साहिल आणि मुख्य आरोपी चेतन हे मित्र असल्याने, त्यांना या नियोजित हत्येची पूर्वकल्पना असण्याची दाट शक्यता असल्याचे विशाल अग्रवाल यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करताना म्हटले की, “शिक्षित आणि संपन्न घरातील तरुण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे का वळत आहेत, हे समजण्यापलीकडचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत स्वतः जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.






