लोणी काळभोर, ता. २६ : आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्त रुग्णाला तातडीने उपचार मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार मानला जातो. मात्र, कुरकुंभ (ता. दौंड) जवळील भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतकरी महिला सुजाता लोहार यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये डिपॉझिटची रक्कम भरण्याची अट घालण्यात आल्याने वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे धर्मादाय रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटल हे धर्मादाय रुग्णालय म्हणून कार्यरत आहे. शासनाच्या नियमांनुसार अशा रुग्णालयांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांसाठी १० टक्के खाटा पूर्णपणे मोफत आणि १० टक्के खाटा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आदी विविध शासकीय योजनांद्वारे पात्र रुग्णांना उपचार उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात रुग्णालय प्रशासनाकडून डिपॉझिटशिवाय उपचार करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळसे कुटुंबीय लग्नसमारंभ आटोपून धाराशिवहून पुण्याकडे परत येत होते. २३ जून रोजी पहाटे कुरकुंभ (ता. दौंड) येथे त्यांच्या टेम्पोचे डिझेल संपल्याने वाहन महामार्गाच्या कडेला उभे करण्यात आले होते. त्यावेळी भरधाव आलेल्या एमएच-१२ व्हीटी-१८७१ क्रमांकाच्या टाटा ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात मनीषा चाफेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुजाता लोहार गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या हातावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. प्राथमिक उपचारासाठी त्यांना दौंड येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
विश्वराज हॉस्पिटलमध्ये रुग्णाला प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले; मात्र त्याचवेळी उपचारासाठी पाच लाख रुपयांहून अधिक खर्च येईल, असे सांगण्यात आले. एवढी मोठी रक्कम तातडीने उभी करणे शक्य नसल्याने नातेवाईकांनी सकाळी सातच्या सुमारास रुग्णाला पुण्यातील दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ससून रुग्णालयात उपचार सुरू होईपर्यंत मोठा विलंब झाला आणि अखेर उपचारादरम्यान सुजाता लोहार यांचा मृत्यू झाला.
विश्वराज हॉस्पिटलच्या दर्शनी भागावर हे धर्मादाय रुग्णालय असल्याची स्पष्ट माहिती नाही. तसेच मोफत उपचार, राखीव खाटा किंवा शासनाच्या आरोग्य योजनांबाबत माहिती देणारे फलकही सहज दिसून येत नाहीत. त्यामुळे गरीब नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. तसेच रुग्णांना मार्गदर्शन करणारी यंत्रणाही प्रभावीपणे कार्यरत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला स्थिर होईपर्यंत उपचार करणे हे प्रत्येक रुग्णालयाचे कायदेशीर आणि नैतिक कर्तव्य आहे. मात्र आर्थिक अटी पुढे करून उपचारात विलंब झाला आणि त्याची किंमत एका निष्पाप महिलेच्या जीवाने मोजावी लागली आहे. या दुर्घटनेला सर्वस्वी जबाबदार विश्वराज हॉस्पिटल आहे. असा थेट आरोप सुजाता लोहार यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात विश्वराज हॉस्पिटलने कोणते नियम पाळले? धर्मादाय रुग्णालय म्हणून त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांचे पालन झाले का? शासनाच्या योजनांतील लाभ का मिळाला नाही? या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांसह विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. या गंभीर आरोपांबाबत विश्वराज हॉस्पिटलची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
‘वशिला’ असेल तरच लाभ?
“मोठ्या नेत्याचा फोन आल्याशिवाय धर्मादाय योजनेचा लाभ मिळत नाही,” असा गंभीर आरोप अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. आमदार, खासदार किंवा प्रभावशाली नेत्याची शिफारस अथवा फोन आल्याशिवाय गोरगरीब व गरजू रुग्णांना मदत केली जात नाही, अशी भावना अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी राखीव असलेल्या १० टक्के मोफत व १० टक्के सवलतीच्या खाटांचा लाभ सर्व पात्र रुग्णांना समान निकषांवर मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्वसामान्य रुग्णांना या योजनांची माहिती दिली जात नाही किंवा लाभ मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागते. जर खरोखरच प्रभावशाली व्यक्तींच्या शिफारशीशिवाय लाभ मिळत नसेल, तर धर्मादाय रुग्णालयांचा उद्देशच काय? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत असून, या आरोपांची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.






