केडगाव : समाजजीवनातील घडामोडी, बदल आणि वास्तव साहित्याच्या माध्यमातून शब्दबद्ध होऊन पुस्तकांच्या रूपात जतन झाले, तर तोच खरा इतिहास ठरतो. समाज घडविणारे, वास्तव मांडणारे आणि सृजनशील साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आणि भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाचवे भीमथडी मराठी साहित्य संमेलन 23 आणि 24 मे 2026 रोजी उत्साहात पार पडले. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा संगम पाहायला मिळाला.
या संमेलनाला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, स्वागताध्यक्ष डॉ. रोहन खवटे, निमंत्रक डॉ. भरत खळदकर, सहनिमंत्रक रामचंद्र नातू, अभिनेते सुरज पवार, अभिनेत्री कोमल शिंपी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, वारकरी सेवा संघाचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संमेलनाची सुरुवात श्री बोरमलनाथ महाराजांना भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक आणि ग्रंथदिंडीने करण्यात आली. ग्रंथदिंडीत कवी, लेखक आणि साहित्यिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन आणि समारोप अशा विविध कार्यक्रमांनी संमेलन रंगतदार झाले.
महादेव जानकर यांनी यावेळी बोलताना भीमथडी मराठी साहित्य चळवळीचे कौतुक केले. कोणतेही शासकीय अनुदान नसतानाही अनेक अडचणींवर मात करत हा साहित्य मेळावा आयोजित केला जातो. नवोदित कवी, लेखक आणि कलावंतांना व्यासपीठ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू असून यासाठी भविष्यातही सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनीही या साहित्य चळवळीचे कौतुक करत, साहित्य आणि सांस्कृतिक दृष्ट्या तालुका सक्षम करण्यासाठी भीमथडी मराठी साहित्य संमेलन महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे म्हटले.
ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी महाराष्ट्रातील सर्वोत्तम मराठी साहित्य भवन दौंड तालुक्यातील चौफुला येथे उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. लोकसहभाग आणि शासकीय मदतीच्या माध्यमातून हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, साहित्यिकांसाठी आश्रम, ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, सांस्कृतिक सभागृह आणि सांस्कृतिक उद्यान यांसारखे विविध उपक्रम उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या साहित्य संमेलनात विविध साहित्यिक, कवी, कलावंत आणि मान्यवरांनी सहभाग घेतला. संमेलनाने साहित्य, संस्कृती आणि समाजजीवनातील वास्तव मांडणाऱ्या विचारांना नवे व्यासपीठ मिळवून दिले. दोन दिवस चाललेल्या या संमेलनाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.






