खेड: महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर आता काहीसा मंदावला आहे. नद्यांची पाणी पातळी कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी आता एका वेगळ्याच संकटाने डोके वर काढले आहे. पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेल्या महाकाय मगरी आता मानवी वस्त्या आणि शेतात दिसून येत आहेत. विशेषतः सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात मगरींच्या वावरामुळे स्थानिक लोकांच्या मनात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीपात्रातील मगरी बाहेर पडल्या आहेत. मगरींनी आपला मुक्काम थेट शेतात केल्यामुळे शेतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

तशीच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातही पाहायला मिळत आहे. नारंगी नदीचे पाणी ओसरल्यानंतर जवळच्या गाव परिसरात मगरी वावरताना दिसत आहेत. कॉलेजच्या आसपासच्या सखल भागातही मगरींचा वावर वाढला आहे. या भागात मगरींचे अस्तित्व पूर्वीपासून असले, तरी पुरामुळे त्या आता थेट घरांच्या आणि शेतीच्या जवळ पोहोचल्या आहेत.

या धोकादायक स्थितीमुळे वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मासे पकडण्यासाठी किंवा गुरे चारण्यासाठी नदीकडे जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. दरम्यान, पुराचे पाणी ओसरले असले तरी, मगरींच्या वाढत्या वावरामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांच्या काळजीत मोठी भर पडली असून, सर्वजण मोठ्या सावधगिरीने पावले उचलत आहेत.







