पुणे : गेल्या काही दिवसांपासून महायुतीत अर्थखात्याच्या वाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे.याच वादाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित दिल्ली दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. ते दोन दिवसांच्या दिल्ली प्रवासावर जाणार होते, मात्र शेवटच्या क्षणी हा निर्णय बदलण्यात आला आहे.

या राजकीय गोंधळाचे मुख्य कारण राज्याचे अर्थ खाते मिळवण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हे महत्त्वाचे खाते मिळवण्यासाठी आग्रही आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये (NDA) सहभागी होणार असल्याची दाट चर्चा आहे.

दरम्यान शरद पवार यांच्या पक्षाकडे अर्थ खाते सोपवण्याबाबत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.मात्र, राष्ट्रवादीला अर्थ खाते देण्यास एकनाथ शिंदे यांचा तीव्र विरोध असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आपल्या मागील दिल्ली दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती.
या सर्व घडामोडींदरम्यान, काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे 45 मिनिटे गुप्त चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही, पण यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर, आज एकनाथ शिंदे नंदनवन येथे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटाच्या नेत्या सुनेत्रा पवार या देखील अर्थखात्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या सातत्याने होणाऱ्या गाठीभेटींमुळे आगामी काळात राज्यातील सत्तेचे समीकरण काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







