पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. डिझेलच्या वाढलेल्या किमती, कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांतील वाढ, वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयामुळे यापूर्वी साध्या बससाठी लागू करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या खर्चामुळे महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण येत होता. राज्यभरातील लाखो प्रवाशांना नियमित, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे एसटीची सेवा अधिक सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत करण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलचे दर वाढले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ झाली असून वाहनांच्या देखभाल खर्चातही मोठी वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
यापूर्वी गर्दीच्या हंगामात साध्या बसच्या भाड्यात १० टक्के तात्पुरती वाढ करण्यात आली होती. ही वाढ १५ जुलैपर्यंत लागू होती. त्यानंतर ती ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता १३.५६ टक्क्यांच्या नव्या भाडेवाढीला मंजुरी मिळाल्याने १० टक्क्यांच्या हंगामी भाडेवाढीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
नव्या भाडेदरांमुळे राज्यभरातील एसटी प्रवाशांना आता प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा परिणाम सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर होणार असला, तरी एसटीची सेवा सुरळीत आणि दर्जेदार ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे.






