मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार (Sunetra Pawar) यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र आजही सुन्न आहे. मात्र, या दु:खाच्या सावटातच राज्याच्या सत्तेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) भवितव्य ठरवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी आता त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार सज्ज झाल्या असून, आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

अजितदादांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी पवार कुटुंबातीलच चेहरा सत्तेत असणे अनिवार्य होते. शुक्रवारी उशिरा सुनेत्रा वहिनींनी या जबाबदारीला होकार दिला आणि त्यानंतर संपूर्ण पवार कुटुंब (पार्थ आणि जय पवार) तातडीने मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर दाखल झाले.
या सर्व घडामोडींत सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या निर्णयाबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगितले. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी हा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला असावा, असे सांगत शरद पवारांनी या प्रक्रियेपासून स्वतःला लांब ठेवले आहे. पवारांच्या या भूमिकेमुळे ‘ही नियुक्ती केवळ पक्षांतर्गत आहे की यामागे काही वेगळी राजकीय खेळी?‘ अशा चर्चांना उधाण आले आहे.







