फुरसुंगी, ता. 18 : लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच “5 लाख रुपये आणि 8 तोळे सोने आण” अशी मागणी करत नवविवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची संतापजनक घटना फुरसुंगी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती राज किशोरचंद्र दादा (वय 34), सासू आशाबेन दादा आणि सासरे किशोरचंद्र दादा (सर्व रा. फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या 28 वर्षांच्या असून सध्या त्या माहेरी वास्तव्यास आहेत. त्यांचे पहिले लग्न तुटल्यानंतर कुटुंबियांनी विवाह संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांचे दुसरे लग्न राज किशोरचंद्र दादा (वय 34, रा. फुरसुंगी) याच्याशी 14 फेब्रुवारी 2026 रोजी आर्य समाज मंदिर, पिंपरी-चिंचवड येथे लावून दिले होते. लग्नानंतर पूजा या पतीसह फुरसुंगी येथील सासरी राहायला गेल्या. सुरुवातीला काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्यानंतर पती, सासू आणि सासरे यांनी “लग्नात माहेरकडून काहीच मिळाले नाही” असे टोमणे मारत 5 लाख रुपये आणि 8 तोळे सोन्याची मागणी सुरू केली.
पीडितेने ही मागणी नाकारल्याने तिचा छळ सुरू झाला. पती राज दादा हा वारंवार शिवीगाळ करत मारहाण करत होता, तर सासू-सासरेही या छळात सहभागी होते. “तू तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये, नाहीतर येथे राहू नकोस,” असे सांगत तिला मानसिक त्रास दिला जात होता. घटनेत आणखी धक्कादायक बाब म्हणजे, 16 मार्च 2026 रोजी पतीने तिच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र आणि तीन तोळ्यांचे नेकलेस जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर तिला माहेरी नेऊन “जोपर्यंत पैसे आणि दागिने देत नाही, तोपर्यंत आम्ही तिला नांदवणार नाही,” असे सांगत सासरच्यांनी तिला तेथेच सोडून दिले.
तेव्हापासून पीडिता आपल्या आई-वडिलांसोबत राहत असून, अखेर तिने फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पती राज दादा, सासू आशाबेन दादा आणि सासरे किशोरचंद्र दादा यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(2), 3(5), 352 आणि 85 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






