न्हावरे: शिरूर तालुक्यातील आंबळे येथे दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून एका १७ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे आंबळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेत सार्थक सतीश बेंद्रे (वय १७, रा. आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबतची फिर्याद मयत विद्यार्थ्याचे वडील सतीश शिवाजी बेंद्रे यांनी शिरूर पोलिसांकडे दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकताच दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता.त्यामध्ये सार्थक नापास झाल्याने तो गेल्या काही दिवसांपासून नाराज व मानसिक तणावाखाली होता. मंगळवारी (दि. १९) रोजी सायंकाळी घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्याने राहत्या घरातील फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान, ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी तातडीने सार्थक याला उपचारासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
हुशार व शांत स्वभावाचा सार्थकच्या अचानक जाण्याने बेंद्रे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण आंबळे गावातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.







