पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होत असल्याने शहरात वारीचा उत्साह वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने नागरिक आणि लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ८ ते १० जुलै या कालावधीत शहरातील नियोजित पाणी कपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

महापालिकेच्या निर्णयानुसार या तीन दिवसांत पुणेकरांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पालख्यांचा पुण्यातील मुक्काम आणि पुढील प्रवास सुरळीत पार पडावा, तसेच वारकरी आणि नागरिकांना पाण्याची कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

वारीदरम्यान पुण्यात राज्यभरातून लाखो वारकरी दाखल होतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. पालखी मार्गांवर अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असून, आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
याशिवाय स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात आला आहे. पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त स्वच्छतागृहे, आरोग्य पथके आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात येणार आहेत. वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेचे विविध विभाग समन्वयाने काम करत आहेत.
वारी सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी वाहतूक, आरोग्य, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या काळात नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.






