लोणी काळभोर, ता. २३ : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटली तरी जन्मभूमी, समाज आणि संस्कारांची नाळ कायम जपणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी कार्याचा आदर्श घालून दिला आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या १९८६ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी कवडीपाट येथील ‘समर्पण वृद्धाश्रम’ येथे जलशुद्धीकरण यंत्रणा (आरओ वॉटर फिल्टर प्लांट) बसवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

या यंत्रणेचे लोकार्पण वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी हभप सुशील महाराज काळभोर, विशाल गुजर, पुणे बार असोसिएशनचे माजी सचिव ॲड. राहुल झेंडे, ‘समर्पण’चे कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे, सखाराम घाडगे, डॉ. लक्ष्मण मासाळ, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर यांच्यासह १९८६ च्या बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना रासकर म्हणाले, “शालेय शिक्षण संपल्यानंतर प्रत्येक जण आपल्या व्यवसायात आणि नोकरीत व्यस्त होतो. मात्र, समाजाशी असलेली नाळ तुटू न देता एकत्र येऊन समाजोपयोगी कार्य करण्याचा उदात्त विचार ही काळाची गरज आहे.” “आजचा हा सोहळा केवळ जलशुद्धीकरण यंत्रणेच्या लोकार्पणाचा नसून, तो कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांचा मेळावा आहे. ‘पाणी हेच जीवन’ असले तरी शुद्ध पाणी म्हणजे आरोग्यदायी जीवन. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी घेत ईश्वरसेवाच करण्यासारखे आहे. या उपक्रमातून तरुण पिढीला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल.”
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, ज्येष्ठ शिक्षिका कल्पना बोरकर, सूर्यकांत गवळी आणि डॉ. लक्ष्मण मासाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र काळभोर यांनी केले, तर सूत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी केले. दरम्यान, चार दशकांनंतरही मैत्री, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.







