पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती/प्रतिनिधी: पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिरुर बायपासजवळील रस्ता (बाह्यवळण) अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरील बाह्यवळण परिसरात तुटलेले दुभाजक, दुभाजकाची कमी झालेली उंची, नियमबाह्य वाहतूक, आणि वाहनांचा भरधाव वेग यामुळे या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बायपासजवळील हॉटेल संग्रामसमोर मंगळवारी,दि.११ झालेल्या भीषण अपघातात एका उद्योजकासह दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.१९९५ च्या आसपास शिरुर शहराबाहेरुन काढण्यात आलेला बायपास (बाह्यवळण) रस्ता आज अत्यंत धोकादायक बनला आहे. बायपास झाल्यानंतर शिरुर शहर व परिसरात वाढते नागरीकरण, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, शोरूम्स व छोटे छोटे व्यवसाय यामुळे परिसरात मोठी रहदारी वाढली आहे.

या महामार्गावरील बायपासजवळील हॉटेल संग्रामसमोरील अनधिकृतपणे तोडण्यात आलेल्या दुभाजकाजवळ अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. शिरुर शहरातील व्यावसायिकाचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाल्यानंतर माजी आमदार ऍड अशोक पवार यांनी तोडण्यात आलेले दुभाजक कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्त करुन घेतले होते, मात्र अवघ्या काही दिवसातच हे दुभाजक पुन्हा तोडण्यात आले असल्यामुळे तिथून अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहने यु टर्न घेताना दिसून येत आहे.
या बायपास रस्त्याला शिरुर शहराच्या उपनगरामधून येणारे अनेक रस्ते जोडण्यात आले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून मोठया प्रमाणात वाहतूक वाढलेली दिसत आहे.मात्र स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने झेब्रा क्रॉसिंग पट्टे, वाहतूक नियंत्रक दिवे आणि गतिरोधक यांचा पूर्णपणे अभाव असल्याचे दिसून येत आहे.
शिरुर बायपासवरील (बाह्यवळण) रस्त्यावर केवळ वाहतूक सुरक्षिततेच्या अभावामुळे गेल्या वर्षभरात जवळपास तीसहुन अधिक छोटे मोठे अपघात होऊन नऊ जणांना निष्पाप आपला बळी गमवावा लागला आहे.तर काही जण जखमी झाले असून, यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशी यांना अक्षरशः आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सांगितले.
शिरुर बायपास रस्त्यालगत शिरुर शहर व परिसरातील वाढते नागरिकरण आणि मोठया प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. बायपास रस्त्यावरील अनधिकृत दुभाजक संबंधित विभागाने तातडीने कायमस्वरूपी बंद करावेत.तसेच या रस्त्यालगत पाषाणमळा येथील भुयारी मार्ग पुन्हा तातडीने सुरु करण्याची मागणी नगरपरिषदेकडे केली असल्याचे शिरुर नगरपरिषदेचे नगरसेवक अमित कर्डीले यांनी सांगितले.






