सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 32 वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. भाग्यश्री नानासाहेब गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. त्या 16 ऑगस्ट रोजी दुपारी घरातून अचानक बाहेर पडल्या होत्या. मात्र, बराच वेळ झाला तरी त्या घरी परतल्या नाहीत.

कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरात तसेच इतर ठिकाणी चौकशी करूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर 17 ऑगस्ट रोजी कुंभारी-दोड्डी रस्त्याच्या कडेला भाग्यश्री यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाजवळ भाग्यश्री यांची दुचाकी पडलेली होती. त्याच परिसरात एक मोठा दगडही आढळल्याने पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा अपघात आहे की महिलेचा घातपात करण्यात आला, याचा तपास आता सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान, शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतर भाग्यश्री यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाग्यश्री घरातून नेमक्या कोणत्या कारणामुळे बाहेर पडल्या होत्या, त्या कुठे गेल्या आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काय घडले, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांकडून विविध बाजूंनी चौकशी केली जात आहे.
सध्या पोलिसांनी अपघाताची शक्यता नाकारलेली नाही. मात्र, घटनास्थळी सापडलेली दुचाकी आणि मोठा दगड यामुळे घातपाताच्या शक्यतेचाही तपास केला जात आहे. वळसंग पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, वैद्यकीय अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.







