उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे प्रेमसंबंधातून घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या पती आणि दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराची हत्या केल्याचा प्रकार पोलिस तपासात उघड झाला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना नावाच्या महिलेचे अमित नावाच्या तरुणासोबत मागील 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही काळानंतर तिची ओळख लोकेश नावाच्या दुसऱ्या तरुणाशी झाली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्यातही प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर अमित हा आपल्या आयुष्यात अडथळा ठरत असल्याचे कल्पनाला वाटू लागले.

अमितची कायमची सुटका करण्यासाठी कल्पनाने कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या योजनेत तिने आपल्या पती संजू आणि प्रियकर लोकेश यांनाही सहभागी करून घेतले. 30 एप्रिलच्या रात्री तिने अमितला काही कारण सांगून घरी बोलावले. तो घरात आल्यानंतर तिघांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला.
लोखंडी वस्तूने मारहाण केल्यामुळे अमितचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह प्लॅटिना दुचाकीवर ठेवून कासिमपूर कालव्यात फेकून दिला. काही दिवसांनी, 2 मे रोजी पोलिसांना कालव्यात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. त्यानंतर सुरू झालेल्या तपासातून संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी कल्पना आणि लोकेश या दोघांना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली लोखंडी वस्तू आणि प्लॅटिना दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या हत्याकांडात सहभागी असलेला महिलेचा पती संजू अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे अलीगढमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.








