बारामती, ता. २७ : बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील श्री शिरसाई विद्यालयात विद्यार्थ्यांकडून शिडी लावून शाळेच्या इमारतीवरील स्वच्छतेचे काम करून घेतल्याचा आरोप काही पालकांनी केला असून, या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेत शिपाई व अन्य कर्मचारी उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची कामे करून घेतली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांना शिडीच्या साहाय्याने उंच ठिकाणी चढवून शाळेच्या इमारतीची स्वच्छता करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारात एखादा अपघात झाला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

विद्यार्थ्यांचे मुख्य कर्तव्य शिक्षण घेणे हे असून, शाळेतील स्वच्छतेसारखी कामे संबंधित कर्मचारी किंवा नियुक्त कर्मचाऱ्यांकडूनच करून घेतली जावीत, अशी मागणी पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारे कोणतेही काम शाळा प्रशासनाने देऊ नये, अशीही भूमिका त्यांनी व्यक्त केली.
याबाबत प्रवीण युवराज शिंदे, बहुजन समाज पार्टीचे बारामती विधानसभा सचिव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “विद्यार्थ्यांना शिडीच्या साहाय्याने उंच ठिकाणी जाऊन स्वच्छतेचे काम करावे लागले असेल, तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत श्री शिरसाई विद्यालय प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करून शाळा प्रशासनाने आपली भूमिका जाहीर करावी, तसेच संबंधित प्रकाराची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.







