पुणे: यंदाच्या पावसाळ्यात पुणे शहर आणि जिल्ह्याला दमदार पावसाचा मोठा फायदा झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही प्रमुख धरणांमध्ये जवळपास पूर्ण क्षमतेने पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता सध्या तरी दूर झाली आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये मिळून तब्बल 29.13 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या 99.94 टक्के इतका आहे. त्यामुळे पुणे शहराला आगामी वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे चित्र आहे.

यंदा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक सातत्याने सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 18 दशलक्ष घनफूट पाणी सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. परिणामी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास टेमघर परिसरात सर्वाधिक 3,110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर पानशेतमध्ये 2,261 मिमी, वरसगावमध्ये 2,112 मिमी, तर खडकवासला परिसरात 746 मिमी पाऊस झाला आहे. या दमदार पावसामुळे चारही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले.
विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये सुमारे 3 टक्के अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणे शहरासह आसपासच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, पाणलोट क्षेत्रात पावसाची शक्यता आणि धरणांमध्ये सुरू असलेली आवक लक्षात घेऊन गरजेनुसार विसर्गाचे नियोजन केले जात आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या मुबलक साठ्यामुळे पुणेकरांसाठी आगामी काळातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटला आहे.






