पुणे: ठाणे परिसरातून शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर २८ जून २०२६ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी परीक्षा परिषदेने उमेदवारांना महत्त्वाचा दिलासा दिला आहे.

परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी स्पष्ट केले की, ज्या उमेदवारांनी यापूर्वी टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची कोणतीही गरज नाही. तसेच पुनर्परीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

“या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थ्यांचा कोणताही दोष नाही. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक किंवा प्रशासकीय भार टाकला जाणार नाही. आधी केलेली नोंदणी कायम राहील आणि त्याच आधारे पुढील परीक्षा घेतली जाईल,” असे प्रिया शिंदे यांनी स्पष्ट केले.
प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आतापर्यंत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील १७२८ परीक्षा केंद्रांवर सुमारे ६ लाख १२५ उमेदवार ही परीक्षा देणार होते. परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी नव्या तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पाहावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






