पुणे: राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात विविध विषयांसाठी स्वतंत्र ‘विषय समित्या’ स्थापन केल्या जाणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत सर्व जिल्ह्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी अद्याप अशा समित्या तयार झालेल्या नाहीत, त्यांनी तातडीने त्याची अंमलबजावणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 जुलै 2026 रोजी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि अभ्यासातील कमतरता दूर करणे हा या समित्यांचा मुख्य उद्देश असणार आहे.

अलीकडे झालेल्या ‘परख’ सर्वेक्षणातून इयत्ता 6 वी आणि 9 वीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये काही अडचणी असल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर आता 6 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
या विषय समित्यांमध्ये अनुभवी, हुशार आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांचा समावेश केला जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक उपक्रम राबवणे, विशेष चाचण्या घेणे, अभ्यासासाठी डिजिटल साहित्य तयार करणे आणि करिअर मार्गदर्शन करणे, अशी जबाबदारी या समित्यांवर सोपवण्यात येणार आहे.
या समित्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक समितीसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला जाईल. त्यामध्ये संबंधित अधिकारी, विषय तज्ज्ञ शिक्षक आणि विस्तार अधिकारी यांचा समावेश असेल. तसेच राज्यस्तरावर तयार होणाऱ्या विशेष गटात प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 5 शिक्षकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
माध्यमिक स्तरावर मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल या विषयांसाठी समित्या तयार केल्या जातील. तर उच्च माध्यमिक स्तरावर भाषा विषयांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, अकाउंटन्सी आणि वाणिज्य विषयांचा समावेश असेल.






