पोपट पाचंगे

रांजणगाव: पुणे (Ranjangaon News) जिल्ह्यातील शिरुर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या भागातील शाळांच्या वेळा बदलण्याचा आदेश देण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थी सुरक्षित राहतील.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या संदर्भात आदेश काढला आहे. यानुसार, बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांची वेळ सकाळी 9.30 ते दुपारी 4 (साडेनऊ ते चार) अशी बदलण्यात आली आहे. संबंधित शाळांनी व्यवस्थापन समिती आणि शाळा समितीची मंजुरी घेऊन या वेळेत बदल करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी पायी शाळेत जातात. रस्त्याच्या कडेने बिबटप्रवण आपत्ती क्षेत्र, ऊस क्षेत्र, डोंगराळ आणि जंगल क्षेत्र असल्याने बिबट्याच्या हल्ल्यांचा धोका अधिक आहे. सध्या ऊसतोडणी सुरू असल्याने उसाचे क्षेत्र कमी होत आहे, ज्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे येत आहेत आणि हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, हिवाळा ऋतूमुळे संध्याकाळी लवकर अंधार पडतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येत होती.
जिल्ह्यातील विशेषतः शिरुर, आंबेगाव,जुन्नर व खेड तालुक्यातील बहुतांश गावात सध्या बिबटयाचा वावर वाढलेला आहे. त्यातच प्रशासनाने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांसह शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
-पोपट पाचंगे, रांजणगाव गणपती.







