पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: आधीच आर्थिक अडचणीत (Ranjangaon) सापडलेल्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे आता नवे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यातील रांजणगाव गणपती, खंडाळे व पिंपरी दुमाला परिसरातील शेतांमधून पिकांसाठी ठेवलेले ठिबक सिंचनाचे साहित्य आणि पाईप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना तक्रारी अर्ज दिला आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिकांसाठी मोठ्या खर्चातून ठिबक सिंचन यंत्रणा बसवली होती. मात्र, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश करून पाईप कापून नेल्याचे दिसून आले. सकाळी शेतात गेल्यावर शेतकरी अजित खेडकर, गहिनीनाथ नरवडे, भानुदास खेडकर, संकेत नरवडे, कैलास नरवडे व भाऊसाहेब नरवडे यांच्या ही बाब निदर्शनास आली.
या चोरीमुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. खत, बियाणे व मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ठिबक सिंचन व्यवस्था पुन्हा उभारण्यासाठी आता पुन्हा मोठा खर्च करावा लागणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
परिसरात यापूर्वीही शेती साहित्याच्या चोरीच्या अनेक घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी, तसेच ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.







