पुणे: महाराष्ट्रातील (Pune News) २९ महानगरपालिकांच्या सत्तेचा फैसला आज मतपेटीत बंद होत असतानाच, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदानाचा पुरावा म्हणून बोटावर लावली जाणारी ‘शाई’ चक्क साध्या लिक्विडने पुसली जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुण्यात समोर आले आहे. या प्रकारामुळे सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाच्या ‘मार्कर पेन’ प्रयोगावर टीकेची झोड उठवली आहे.

पुण्यातील धायरी परिसरात आज सकाळी मतदानादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काही महिला वारंवार मतदान केंद्रात शिरत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. अधिक तपास केला असता, बाहेरून काही महिलांना आणून बोगस मतदान सुरु असल्याचे समोर आले. कार्यकर्त्यांनी एका महिलेला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले.
यंदा आयोगाने ‘मार्कर पेन’चा वापर केला. हा मार्कर केवळ नावापुरता ‘परमनंट’ ठरला आहे. यामुळे एकाच व्यक्तीने अनेकदा मतदान केल्यास (बोगस मतदान) त्याला रोखणे अशक्य झाले आहे. दरम्यान, धायरीतील या घटनेनंतर इतर केंद्रांवरही तणावाचे वातावरण असून मतदारांमध्ये संभ्रम पसरला आहे. विरोध सध्या या प्रकारामुळे चांगलाच संताप व्यक्त करत आहेत.







