पुणे: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर-कदमवाकवस्ती जिल्हा परिषद गटातून (Loni Kalbhor-Kadamwakwasti Zilla Parishad) शीतल कांबळे (Sheetal Kamble) यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा शेलार आणि लोणी काळभोरचे माजी सरपंच चंदर शेलार यांच्या पाठिंब्याने शीतल कांबळे या निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांचे सासरे प्रल्हाद कांबळे हे अनेक वर्षांपासून समाजकारणात सक्रिय होते. पती अॅड. सुजित कांबळे हेही सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोणी काळभोर जिल्हा परिषद गटात शीतल कांबळे या प्रबळ उमेदवार मानल्या जात आहेत.
‘पुणे प्राईम न्यूज’शी संवाद साधताना शीतल कांबळे यांनी आपल्या विकासात्मक भूमिकेची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “माझ्या गटातील वाहतूक कोंडीची समस्या, जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक चांगल्या व सुसज्ज करणे आणि विशेषतः शिक्षणाचा दर्जा उंचावणे यावर माझा भर राहील.” आपण 12 वर्षे शिक्षिका म्हणून काम केल्याचा अनुभव सांगत त्या पुढे म्हणाल्या की, विद्यार्थी हा सुशिक्षित समाजाचा मुख्य घटक आहे. मुलांनी शिक्षण घेतल्यास कुटुंब आणि समाजाचा विकास होतो. मात्र आर्थिक अडचणींमुळे पालक मुलांना कामावर पाठवतात, त्यामुळे या भागात शालेय गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे, ही गंभीर समस्या आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “या गटातील शेतकऱ्यांना विविध शेतीविषयक योजनांची माहिती देणे, डुप्लिकेट बियाणांबाबत जागरूकता निर्माण करणे हे माझे प्राधान्य असेल.” तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून कुटीर उद्योग उभारून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या भागातील सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व आवश्यक मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “जनतेने संधी दिल्यास माझा कारभार पारदर्शक राहील. भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याचा माझा ठाम निर्धार आहे,” असे सांगत दर्जेदार शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि शेती या विषयांवर प्राधान्याने काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मायबाप जनता आपल्या पाठीशी उभी राहील, असा विश्वासही शीतल कांबळे यांनी व्यक्त केला.







