पुणे: पुण्यातील (Pune News) हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा येथील आयटी पार्कमध्ये अनेक कंपन्या खर्च कपातीचा विचार करत असल्याने नोकरकपातीची भीती आहे. मात्र घाबरू नका, तुम्ही या नोकरकपातीतून सुटू शकतात. ज्यांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), क्लाउड आर्किटेक्चर, डेटा सायन्स आणि सायबर सुरक्षा यांसारख्या आधुनिक कौशल्यांवर प्रभुत्व आहे, त्यांना अनेक संधी चालून येत आहेत.

सध्याच्या जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या ‘गरजेच्या नसलेल्या’ खर्चांना कात्री लावली आहे. ज्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा घरचा रस्ता दाखवला आहे. नवीन प्रकल्प संथगतीने येत आहेत किंवा मोठे करार अडकून पडले आहेत , ज्यामुळे कंपन्या नोकर कपात करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आर्थिक मंदी असल्याने ग्राहक खर्च कमी करत आहेत. याचा परिणाम म्हणून आयटी क्षेत्रात रिसेशन आले आहे.
सध्याच्या नोकरकपातीमागे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि Automation हे प्रमुख घटक आहेत. या तंत्रज्ञानामुळे अनेक कामे आता खूप वेगाने आणि कमी मनुष्यबळात पूर्ण होतात. बॅक-ऑफिसची कामे आणि काही प्रमाणात मध्यम-स्तरीय व्यवस्थापनाची कामेही आता सॉफ्टवेअर अल्गोरिदम्स हाताळत आहेत. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांची गरज कमी झाली आहे.
जावा, डॉट नेट, टेस्टिंग यांसारख्या पारंपरिक कौशल्यांवर काम करणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, कंपन्यांना आता क्लाउड, जनरेटिव्ह एआय आणि डेटा अभियांत्रिकीचे सखोल ज्ञान असलेले लोक हवे आहेत. जुनी कौशल्ये आणि नवीन तंत्रज्ञानाची मागणी यांच्यातील ही मोठी दरीच सध्याच्या नोकरकपातीचे प्रमुख कारण बनली आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांनी वेळेनुसार स्वतःला अद्ययावत करणे, नवीन कौशल्ये शिकणे आणि ‘अपस्किल’ (Upskill) करणे हे आजच्या काळाची गरज आहे. ज्यांच्याकडे ही नवीन कौशल्ये आहेत, त्यांना पुण्यात आजही चांगले पॅकेजेस आणि उज्ज्वल संधी मिळत आहेत.







