शिरूर: हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे व चुकीच्या उपचारपद्धतीमुळे पूजा गई (वय-२७) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत पती राहुल देवीदास गई यांनी मंगळवारी (ता.१) शिरूर तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी. या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान पुढील १५ दिवसांत न्याय न मिळाल्यास कोळपे हॉस्पिटलसमोर आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा राहुल गई यांनी दिला आहे.

पूजा राहुल गई यांना हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेसाठी ६ ऑगस्ट २०२६ रोजी शिरूर परिसरातील बाबुराव नगर येथील कोळपे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप राहुल गई यांनी केला आहे. या घटनेनंतर प्रकरणाची चौकशी सुरू असून, तब्बल एक महिना उलटला आहे.दरम्यान पूजा गई यांच्या मृत्यूनंतर ससून रुग्णालयात ऑन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले होते. तरी अद्याप अंतिम वैद्यकीय अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई रखडल्याने राहुल गई यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘पत्नीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला? आणि त्याला कोण जबाबदार आहे? याचा निष्पक्ष तपास होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी भूमिका घेऊन राहुल गई यांनी प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. या प्रकरणाची स्वतंत्र,निष्पक्ष आणि तज्ज्ञ वैद्यकीय समितीमार्फत सखोल चौकशी करावी, उपचारादरम्यान झालेल्या कथित हलगर्जीपणा व निष्काळजीपणास जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. कोळपे हॉस्पिटलवर प्रशासकीय कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय व योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी राहुल गई यांनी केली आहे.

पोलिसांची आंदोलनकर्त्यांशी भेट
दरम्यान,आंदोलनस्थळी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके यांनी राहुल गई यांची भेट घेऊन चर्चा केली. शवविच्छेदनाचा अंतिम वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी संबंधित विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वैद्यकीय अहवाल लवकरात-लवकर उपलब्ध करून देण्याची सूचना केली.
मात्र,केवळ आश्वासनावर समाधान न मानता ठोस कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका राहुल गई यांनी घेतली आहे. पुढील १५ दिवसांत प्रशासनाने या प्रकरणात ठोस निर्णय घेऊन दोषींवर कारवाई केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा गई यांनी दिला आहे.
या प्रकरणातील अंतिम वैद्यकीय अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून,अहवालानंतर प्रशासन आणि पोलीस कोणती भूमिका घेतात.याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.






