आळंदी: आळंदीतील गजबजलेल्या भाजी मंडईत जुन्या उसन्या पैशांच्या वादातून एका तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे बाजार परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी दोन तरुणांविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कृष्णा कोळेकर (वय 27, रा. कोयाळी) हे 11 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 3 वाजता आळंदीतील भाजी मंडईत भाजी विकत होते. त्यावेळी तुषार मोहन कोळेकर (वय 26) आणि चैतन्य स्वास्तिक कोळेकर (वय 21, दोघेही रा. कोयाळी) तेथे आले. जुन्या उसन्या पैशांच्या कारणावरून दोघांनी अक्षय यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढला आणि आरोपींनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. याचवेळी एका आरोपीने अक्षय यांच्या मानेवर दगडाने प्रहार केला. या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली.

हल्ल्यानंतर आरोपींनी अक्षय यांना कोयत्याने तुकडे- तुकडे करून कापून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे भाजी मंडई परिसरात एकच खळबळ उडाली. भरदिवसा झालेल्या या घटनेने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर अक्षय कोळेकर यांनी तातडीने आळंदी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तुषार कोळेकर आणि चैतन्य कोळेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आळंदी पोलीस करीत आहेत.







