शिरूर: कोळपे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान पूजा गई यांच्या मृत्यूच्या प्रकरणाने शिरूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच,शिरूर तालुक्यातील व शहरातील काही खासगी हॉस्पिटलमध्ये पात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांऐवजी अनुभवहीन अथवा अपात्र व्यक्तींकडून इंजेक्शन देणे व रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्था नेमकी कोणाच्या भरवशावर चालते? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

काही हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण अथवा आवश्यक पात्रता नसलेल्या व्यक्तींकडून रुग्णांवर उपचार केले जात असल्याच्या तक्रारी असून,अशा प्रकारांची आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. विशेषतः इंजेक्शन देणे,औषधोपचार करणे यांसारखी महत्त्वाची कामे अपात्र व्यक्तींकडून केली जात असतील, तर हा प्रकार रुग्णांच्या जिवाशी थेट संबंधित असल्याने त्याची तातडीने चौकशी होणे आवश्यक आहे.

गर्भलिंग निदानाच्या आरोपांनीही चिंता
शिरूर तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्यांसह काही हॉस्पिटलमध्ये विविध अनधिकृत प्रकार सुरू असल्याच्या तक्रारीही वेळोवेळी समोर येत आहेत. मात्र, या तक्रारींची संबंधित आरोग्य यंत्रणेकडून प्रभावीपणे चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत आहे का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

उपचाराऐवजी विमा क्लेमवर भर?
गतवर्षी न्हावरे येथील एका रुग्णाच्या उपचाराबाबतही गंभीर आरोप करण्यात आले होते. संबंधित रुग्णाला अपेक्षित उपचार देण्याऐवजी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात खर्च करून घेण्यात आला आणि विम्याचा क्लेम पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला घरी घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.
त्यानंतर नातेवाईकांनी त्या रुग्णाला पुण्यातील एका अन्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले.तेथे योग्य उपचार मिळाल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारली आणि आज तो सामान्य जीवन जगत असल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे रुग्णांच्या आरोग्यापेक्षा आर्थिक व्यवहारांना प्राधान्य दिले जात असल्याच्या आरोपांना पुन्हा एकदा वाचा फुटली आहे.
‘रक्षकच भक्षक’ झाल्याची भावना
एकीकडे रुग्णांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवला जातो, मात्र काही ठिकाणीच जर नियमांना हरताळ फासला जात असेल,तर ‘विश्वास ठेवायचा तरी कोणावर?’ असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेत ‘रक्षकच भक्षक’ झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.
कोळपे हॉस्पिटलमधील मृत्यू प्रकरणाचा अंतिम वैद्यकीय अहवाल अद्याप प्रतीक्षेत असताना, तालुक्यातील खासगी हॉस्पिटलच्या एकूणच कामकाजाची व्यापक तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हॉस्पिटलची नोंदणी, डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता, कार्यरत वैद्यकीय व परिचारिका कर्मचारी,औषधोपचाराची पद्धत, आपत्कालीन सुविधा, रुग्णांच्या नोंदी तसेच विमा दाव्यांची प्रक्रिया यांची संबंधित विभागाने तपासणी करण्याची आवश्यकता आहे.
आरोग्य विभाग झोपेत की ‘सगळे आलबेल’?
शिरूर तालुक्यात अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतील,तर आरोग्य विभाग नेमकी कोणती कारवाई करीत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉस्पिटलवर ठोस कारवाई झाली नाही,तर भविष्यात एखाद्या निष्पाप रुग्णाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
शिरूर तालुक्यातील सर्व खासगी हॉस्पिटलची विशेष तपासणी मोहीम राबवून अपात्र व्यक्तींकडून होणाऱ्या उपचारांना आळा घालावा, बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या तक्रारींची चौकशी करावी, विमा दाव्यांमधील संभाव्य गैरप्रकार तपासावेत आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सामान्य नागरिकांच्या जीवाशी संबंधित असलेल्या आरोग्य व्यवस्थेबाबत प्रशासनाने आता ‘तक्रार आल्यानंतर कारवाई’ या पद्धतीऐवजी स्वतःहून तपासणी व कठोर देखरेख सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.






