डॉ. अशोक बालगुडे

पुणे: वय वाढलं… आयुष्याच्या वाटा बदलल्या… प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात स्थिरावला, मात्र शाळेच्या आठवणींची ओढ कायम राहिली! तब्बल 40 वर्षांनंतर समता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. उरुळी देवाची (ता. हवेली) येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या समता विद्यालयातील सन 1984-85 व 1985-86च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

या स्नेहमेळाव्यात एकमेकांची आस्थेने विचारपूस करताना बालपणीच्या आठवणी, गंमती-जमती आणि शाळेतील अविस्मरणीय प्रसंगांना उजाळा मिळाला. चाळीस वर्षांनंतर मित्र भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्या काळातील संघर्षाच्या आठवणी सांगताना माजी विद्यार्थ्यांनी भावनिक होत, ‘‘त्या काळात सुविधांचा मोठा अभाव होता. अनेक विद्यार्थी चार-पाच किलोमीटर अंतरावरून अनवाणी शाळेत येत आणि दिवसभर काम करून शिक्षण घेत. शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आम्ही घडलो आणि पुढे आमच्या मुलांनाही चांगले संस्कार देऊ शकलो,’’ अशी भावना व्यक्त केली.

विशेष म्हणजे, चार दशकांपूर्वी खासगी जागेत सुरू असलेली शाळा आज भव्य इमारतीत विस्तारली आहे. संस्थेच्या माध्यमातून मराठीबरोबरच इंग्रजी माध्यमातूनही विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शाळेतील हा बदल पाहताना माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना नव्या आठवणींची जोड मिळाली.
या वेळी माजी शिक्षक शिवाजी चव्हाण, एस. बी. पाटील, नेताजी शुक्रे, सुभाष भारद्वाज, सीताराम रासेराव, अनुपमा नगरकर, सविता भारद्वाज आणि नारायण भोसले यांनी मार्गदर्शन केले. या स्नेहमेळाव्याचे आयोजन नाना बाजार, अतुल झांबरे, सुनीता भाडळे, विलास सातव, सुभाष बनकर, सुभाष मोडक, गोविंद झांबरे, रवींद्र भाडळे, रमेश विधाते, हिरामण गायकवाड आणि प्रभावती म्हेत्रे यांनी केले.
गुरू आजारी; शिष्य पोहोचले थेट दवाखान्यात!
गुरु-शिष्य नात्याचा हृदयस्पर्शी प्रत्यय या स्नेहमेळाव्यात आला. माजी वर्गशिक्षिका अरुणा जोशी आजारी असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे समजताच माजी विद्यार्थ्यांनी थेट दवाखाना गाठून त्यांची भेट घेतली. यावेळी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.‘‘गुरूंनी दिलेल्या संस्कारांची परतफेड कधीच शक्य नाही; मात्र त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हीच आमची जबाबदारी आहे,’’ अशा भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती असलेला आदर व्यक्त केला.







