न्हावरे: शिरूर तालुक्यातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा धक्कादायक वळण घेतले असून,करडे गावातील भैरवनाथ मंदिर परिसरात मध्यरात्री झालेल्या कथित गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे.आठ जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीला घेरून त्याच्यावर दोन वेळा गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मात्र, प्रसंगावधान राखत संबंधित व्यक्तीने जवळील पाण्यात उडी घेतल्याने त्याचा थरारक बचाव झाल्याचे समजते.या घटनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,शनिवार (दि. १८) रोजी पहाटे सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान करडे येथील भैरवनाथ मंदिर परिसरात संबंधित व्यक्तीला आठ जणांच्या टोळक्याने अडविले. काही क्षणांतच वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले आणि हल्लेखोरांनी त्याच्यावर दोन वेळा गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

गोळीबारातून जीव वाचविण्यासाठी संबंधित व्यक्तीने कोणताही विलंब न करता जवळील पाण्यात उडी घेतली. अंधाराचा फायदा घेत तो हल्लेखोरांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाला. प्राथमिक माहितीनुसार त्याला गोळी लागली नसून तो सुदैवाने बचावला आहे. अन्यथा ही घटना थेट खुनात परिवर्तित झाली असती, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
या हल्ल्यामागे पूर्वनियोजित कट, जुने वैमनस्य,आर्थिक व्यवहार की अन्य कोणते कारण आहे,याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.मात्र आठ जणांनी एकत्रितपणे एखाद्या व्यक्तीवर थेट गोळीबार करणे ही अत्यंत गंभीर बाब असून, हल्ल्यामागे संघटित गुन्हेगारीचा किंवा टोळीसंघर्षाचा कोन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांचा मोठा फौजफाटा करडे गावात दाखल झाला.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. गोळीबाराच्या खुणा,रिकाम्या पुंगळ्या, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन,तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान,शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून मारामाऱ्या, प्राणघातक हल्ले, अवैध शस्त्रांचा वापर,दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांच्या कारवाया आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत मंदिर परिसरातच मध्यरात्री गोळीबार झाल्याने ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटना घडल्यानंतर पोलिस यंत्रणा सक्रिय होत असली,तरी अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिबंधात्मक कारवाई,गुन्हेगारांवरील वचक आणि गुप्त माहिती यंत्रणा कितपत प्रभावी आहे. असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. गावागावांत वाढणारे टोळीसंघर्ष आणि अवैध शस्त्रांचा संभाव्य सुळसुळाट ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी या प्रकरणातील सर्व आरोपींची तातडीने ओळख पटवून त्यांना अटक करावी,वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करावे आणि संपूर्ण कटाचा सूत्रधार उघड करावा.अशी जोरदार मागणी केली आहे. या गुन्ह्यामागे कोणाचे राजकीय किंवा अन्य प्रकारचे संरक्षण आहे का, याचाही निष्पक्ष तपास व्हावा, अशीही मागणी पुढे येत आहे.
करडे येथील ही घटना केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून, शिरूर तालुक्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर इशारा मानला जात आहे. आरोपींवर तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आणखी वाढेल,अशी भीती व्यक्त होत आहे.त्यामुळे शिरूर पोलिसांनी या प्रकरणाचा वेगवान, निष्पक्ष आणि सखोल तपास करून दोषींना कायद्याच्या कठोर चौकटीत आणणे ही काळाची गरज बनली आहे.







