पुणे: राज्यातील शाळा आणि महाविद्यालय परिसरात विकल्या जाणाऱ्या आरोग्यास अपायकारक शीतपेयांवर तसेच दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष मोहीम राबविणार असल्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत केली. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारने ही भूमिका स्पष्ट केली.

आमदार राहुल कुल यांनी राज्यातील अनेक शाळांच्या परिसरात एनर्जी ड्रिंक्स, घातक ‘कटिंग पान’ आणि विविध फ्लेव्हर्ड मिल्कची विक्री होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. या उत्पादनांमध्ये कृत्रिम रंग, अतिरिक्त साखर आणि काही ठिकाणी अंमली पदार्थांचा वापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे नमूद करत अशा उत्पादनांवर नियंत्रणासाठी राज्यव्यापी मोहीम राबविण्याची मागणी त्यांनी केली.

यासोबतच राज्यातील दुधातील भेसळ रोखण्यासाठी प्रभावी धोरण राबविण्याची गरजही त्यांनी मांडली. अनेक दूध संकलन केंद्रांवर तपासणीची सुविधा नसल्यामुळे भेसळीचे प्रकार वाढत असल्याचे सांगत, दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितले की, राज्यात अन्न नमुन्यांची तपासणी अधिक वेगाने करण्यासाठी पुणे, नाशिक, रायगड आणि यवतमाळ येथे नवीन अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहेत. सध्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे अशा प्रयोगशाळा कार्यरत आहेत. तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारीतून आणखी 22 प्रयोगशाळा उभारण्याचे काम सुरू आहे.
मंत्र्यांनी पुढे सांगितले की, अन्न नमुन्यांचे अहवाल पूर्वी तीन महिन्यांनी मिळत होते. मात्र, आता ही प्रक्रिया वेगवान करण्यात आली असून एका महिन्याच्या आत अहवाल उपलब्ध होत आहेत. हा कालावधी आणखी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सदोष अन्नपदार्थ आढळल्यास संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून त्यांच्या उत्पादनांचे बॅचेसही मागे घेण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.







