पुणे: पुणे जिल्ह्यातील पानशेत-पुणे मार्गावरील पानशेत वसाहतीजवळील सांडव्यावरील मुख्य पूल सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राजगड (वेल्हे), मुळशी आणि हवेली तालुक्यातील सुमारे 28 गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात हा पूल बंद झाल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागत आहे.

पूल बंद झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये, बँका, सरकारी कार्यालये आणि रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय वाढली आहे. अनेकांना अधिक अंतराचा प्रवास करावा लागत असून वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत.

गेल्या वर्षी मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे धोकादायक पूल कोसळून काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आणि आवश्यक त्या पुलांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील पुलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे तसेच काही पुलांना तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे आढळून आले.
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी धोकादायक पूल पाडण्यापूर्वी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ते वाहतुकीस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पानशेत वसाहतीजवळील मुख्य पूलही बंद करण्यात आला आहे. दरम्यान, पूल बंद झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था किंवा नवीन पूल उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.







