पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह झाले असून याचा सर्वाधिक फटका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसला आहे. पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. धुळ्यावरून निघालेल्या हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर आता ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा सक्रियझाले आहे . शुभांगी पाटील यांच्या रूपात ठाकरे गटाला हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शुभांगी पाटील यांनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याच्या या राजकीय निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे . त्या म्हणाल्या, “माझी उद्धव ठाकरे साहेबांवर वैयक्तिक कोणतीही नाराजी नाही. परंतु, माझ्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा तीव्र आग्रह धरला होता. त्यांच्या याच इच्छेचा मान राखून मी शिंदे गटात प्रवेश करत आहे.”
यापूर्वी ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी मतदारसंघात विकासनिधी मिळत नसल्याचे कारण देत सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला होता. या खासदारांच्या आणि आता शुभांगी पाटील यांच्या पक्षांतरामुळे आगामी काळात ठाकरे गटाचे आणखीही काही मोठे नेते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.







