दिल्ली: दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन गेल्या 34 दिवसांपासून अखंडितपणे सुरूच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत. आंदोलक आणि सरकार यांच्यात अद्याप कोणतीही ठोस वा यशस्वी चर्चा होऊ शकलेली नाही. यादरम्यान, काल रात्रीच्या सुमारास जंतरमंतर परिसरात अचानक मोठा गदारोळ उडाला आणि काही असामाजिक तत्त्वांनी पोलिसांवर अचानक दगडफेक व बाटल्यांचा मारा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे. लोकशाहीच्या मार्गाने शांततेच्या माध्यमातून आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, असे स्पष्ट करत त्यांनी आंदोलकांनी किंवा पोलिसांनी कोणत्याही प्रकारची हिंसा करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. हिंसेला कुठेही थारा मिळता कामा नये, असे मत त्यांनी मांडले आहे.

पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाचे आवाहन केले की, शैक्षणिक सुधारणांच्या मुद्द्याला जरूर पाठिंबा द्या, परंतु त्यामागे असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा त्यांच्या विचारसरणीचे आंधळेपणाने अनुकरण करू नका. पक्षाचे नेमके उद्दिष्ट काय आहे, हे आधी जाणून घ्या. जोपर्यंत हे विद्यार्थी आंदोलन शिक्षणाशी आणि विद्यार्थ्यांच्या हिताशी जोडलेले आहे, तोपर्यंत ते योग्य आहे. परंतु, जेव्हा हे आंदोलन मूळ विषयापासून भरकटून धार्मिक वळण घेते, तेव्हा त्यामागील हेतू बदलतो, त्यामुळे सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.








